संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले   

डॉ. अरूणा ढेरे यांचे प्रतिपादन 

पुणे : भारतीयांना काळानुरूप परिवर्तनशीलतेचा वारसा लाभला आहे. संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ आपल्याला लाभले असून विश्वकल्याणाची संकल्पना खूप आधीच आपल्यात रुजलेली आहे, असे मत ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरूणा ढेरे यांनी शनिवारी व्यक्त केले.
 
’प्रसाद प्रकाशना’तर्फे डॉ. अरुणा ढेरे आणि ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ प्रा. प्र. के. घाणेकर, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे विश्वस्त राजेश पांडे, प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद ज्ञानपीठच्या संचालक डॉ. उमा बोडस आदी उपस्थित होते. यावेळी प्रसाद प्रकाशन आणि अनाहत प्रकाशनातर्फे विविध १८ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
 
डॉ. ढेरे म्हणाल्या, आपण आजही पाश्चात्यांची संस्कृती पाहण्यासाठी परदेशात जातो. तिथे आपल्याला भग्न अवस्थेतील अनेक अवशेष दिसतात. भारतात मात्र भग्न अवस्थेतील अवशेषांसह सांस्कृतिक धागा आजही जीवंत असल्याचे आपल्याला पहायला मिळते. आपली संस्कृती नानाविविध रूपाने आपल्या पुढे येत असते, आपण ती जपणे आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत करणे, हे आपले कर्तव्य आहे. 
 
राजेश पांडे म्हणाले, समाजचे आपण देणे लागतो या भावनेतून आणि कार्यकर्त्याच्या भूमिकेतून मी काम करत आहे. पुण्याला ज्ञानाचे आणि आध्यात्माचे अधिष्ठान लाभलेले आहे. पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून बुद्धिजीवी पुणेकरांची प्रचिती येते. पुस्तक वाचनाची पुणेकरांची भूक पाहून अचंबित व्हायला होते. डॉ. मुकुंद दातार यांनी मनोगत व्यक्त केले. तर ’हरवलेले पुणे’ या विषयावर प्रा. प्र. के. घाणेकर यांचे व्याख्यान झाले. डॉ. उमा बोडस यांनी प्रास्ताविक केले. सुवर्णा बोडस यांनी सुत्रसंचालन केले. जयश्री नातू यांनी आभार मानले.

Related Articles